गुलजारांचा एकूणच जीवनविषयक दृष्टीकोन विधायक स्वरूपाचा आहे. जीवनातील दु:खद अनुभवांचा धारदार परिचय करून देतानाच ते जीवनातील उजळ बाजूचेही दर्शन घडवितात. तसेच गूढांतील रहस्य अलवारपणे तरल हाताने उकलून दाखवतात. अशाच त्यांच्या तरल आणि आत्मस्पर्शी निवडक कवितांचा मराठी अनुवाद विजय पाडळकर यांनी मराठीतून केला आहे. कवी म्हणून गुलजार मोठेच आहेत पण व्यक्ती म्हणूनही ते मोठे आहेत. विजय पाडळकर, किशोर कदम यांच्याशी जुळलेल्या मैत्रीच्या नात्यातून 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' या सुंदरशा संग्रहाची निर्मिती झाली.
या संग्रहात 'त्रिवेणी' हा वेगळा काव्यप्रकार रसिकांसाठी खास भेट ठरणारा आहे. त्रिवेणी हा हायकूशी नाते सांगणारा काव्यप्रकार गुलजारांनी समर्थपणे हाताळला आहे. तीन ओळींच्या ह्या लहानलहन रांगोळ्या काढताना त्यांच्यामधील सौंदर्यप्रेमी रोमॅंटिक कवी रंगून जातो. इथे जे सांगायचे आहे ते अतिशय थोड्या शब्दांत व परिणामकारकपणे आले पाहिजे. दोन ओळींत एक कल्पना मांडायची आणि तिसऱ्या ओळीत तिला एक वेगळीच दिशा द्यायची अशी रचना करताना गुलजारांच्या प्रतिभेला नवे पंख फुटतात. त्यांची शब्दांवरची हुकूमत आणि कल्पनेच्या भराऱ्या यांचे विस्मयकारक दर्शन या त्रिवेणीत घडते.
कवी, गीतकार यांबरोबर एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून गुलजार यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान मोलाचे आहे. 'जय हो' गीताच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत भारताला ऑस्करसारखा मानाचा दुर्मीळ पुरस्कार मिळवून देणारे गीतकार म्हणून अवघी हिंदी चित्रपटसृष्टी गुलजारांकडे आज आदराने पाहते. तरल, भावस्पर्शी लेखणीतून उतरलेला त्यांचा प्रत्येक शब्द मनाचा ठाव घेत जातो. संपूर्णसिंग कलरा म्हणजे आपल्या सगळ्यांचे गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६ साली पंजाब प्रांतात झाला. 'पुखराज', 'रात पश्मीने की' यांसारख्या काव्यसंग्रहातील उर्दु कवितांनी रसिकांच्या अंत:करणात या प्रतिभावंत कवीने प्रेमादराचे स्थान मिळवले. पुरोगामी विचारसरणीमुळे तरुण पिढीला आपले वाटतात. मातृभाषा उर्दू असली तरी हिंदी आणि मराठीवरही त्यांचे तितकेच प्रेम आहे. कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचा त्यांनी हिंदी, उर्दूत अनुवाद केला आहे.