कळ्यांचे नि:श्र्वास
 कळ्यांचे नि:श्र्वास
Author:  Vibhavari Shirurkar
ISBN:  81-7185-212-3
Format:   Hard Cover
List Price:   100.00/-

१९३३ मध्ये विभावरी शिरूरकर या नावाने मालतीबाई बेडेकर यांनी कळ्यांचे नि:श्र्वास हा पहिला कथासंग्रह लिहिला. लहान वयात घोडनदी गावी कुजबुजीतून त्यांनी जे टिपले, पुढे पुण्यात आल्यावर प्रथम हिंगण्याच्या विद्यार्थीनी-वसतिगृहात, आणि नंतर मुलींच्या शाळेतील शिक्षिका असताना, जे अनुभवले त्यातून स्त्रीच्या कोंडमाऱ्याचे दशावतार त्यांना दिसले. स्त्रीच्या दुर्दशेला कारणीभूत असणारे श्रुतिस्मृतिपुराणोक्त आधार त्यांना सापडले होते. या सगळ्याचा उद्रेक म्हणजे 'कळ्यांचे नि:श्र्वास'चे लेखन. यातील अकरा कथा अवघ्या पंधरा दिवसांत त्यांनी लिहून पूर्ण केल्या असा आवेग त्यांच्या लेखनात होता. प्रेमात असफल, विवाहात असुखी, आईवडीलांशी संघर्ष झाल्याने दु:खी झालेल्या, आईच्या किंवा वडीलांच्या भ्रष्ट आचरणामुळे दु:ख भोगावे लागणाऱ्या अशा स्त्रियांच्या कथा सांगितल्या आहेत. तरूण, यौवनाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलींच्या या कथांनी त्या काळी खळबळ उडवून दिली. 'बाबांचा संसार माझा कसा होणार?', 'त्याग', 'प्रेम की पशुवृत्ती?', 'आई की दावेदारीण' यांसारख्या कथांतून या तरूण मुलींनी जणू त्या काळच्या समाजालाच सवाल केले. या कथांतल्या निर्भीड, प्रांजळ, परिस्थितीने पिडलेल्या तरूणी त्या काळातल्या समाजव्यवस्थेवर भाष्य करतात.

पदवीधर, कॉलेजात शिकणाऱ्या या सुसंस्कारित कुमारिका मुलींनी या कथांमध्ये आपल्या दु:खाचे अनेक पदर उघड केल्याने विभावरी शिरूरकर या नावाबद्दल अनावर कुतूहल झाल्याने या पुस्तकावर टीकेची झोड उठली. या कथासंग्रहाने तत्काळ उच्चभ्रू, बुद्धिवादी समाजाला ढवळून काढले. आज या कथा वाचताना त्या काळात या प्रकारची समाजशल्ये स्पष्ट करून मांडण्यातली विभावरींची निर्भीड वृत्ती जाणवते. त्या काळात रंजनवादी कथांचे प्राबल्य असताना विभावरींनी तंत्राच्या जोखडात न अडकलेली, मानवी मनाचे सहृदयतेने चित्रण करणारी, कळकळीने ओथंबलेली कथा लिहिली व त्यातून काही एक भरीव व नैतिक आशय मांडला.