शिरवाडकर यांचे सर्वांत गाजलेले नाटक, या नाटकाने इतिहास निर्माण केला. आजही प्रत्येक कलाकाराला हे नाटक एक आव्हान वाटतं. या नाटकासाठी शिरवाडकरांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला. नटसम्राट गणपतराव बेलवलकर या माणसाची ही शोकात्मिका आहे. एके काळी नट म्हणून रंगभूमी गाजवलेले गणपतराव आपली सर्व मालमत्ता मुलांमध्ये वाटून टाकतात आणि ऐन वार्धक्यात निराधार होतात, हक्काची मुलंही विचारेनाशी होतात.
वृध्दावस्थेतील एकाकीपणा हा या नाटकातील केंद्रवर्ती आशय असला तरी अत्यंत उत्कट वृत्तीच्या संवेदनाक्षम माणसाला भोवतीच्या व्यवहारी जगातले सांकेतिक जगणे जगता येत नाही. ‘कोणीही कोणाचे नसते’ हा विच्छिन्न करणारा जीवनार्थ या नाटकाला प्राप्त होतो. अत्यंत प्रभावी स्वगते, भावनेला आव्हान करणारी शब्दकळा, आप्पा आणि कावेरी यांची परिणामकारक व्यक्तिचित्रे यांमुळे हे नाटक प्रभावी ठरले. ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीला शिरवाडकरांनी दिलेले हे एक अजरामर रत्न आहे.
वि. वा. शिरवाडकरांनी काव्य आणि नाटयलेखन केले. काव्यलेखन करताना ‘कुसुमाग्रज’ या नावाने लेखन केले. त्यांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला. शालेय जीवनातच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. सुरूवातीच्या काळात त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले, त्यानंतर काही काळ वृत्तपत्रांतही काम केले.
त्यांच्या लेखनातील काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे ‘विशाखा’, ‘मारवा’, ‘कालिदासाचे मेघदूत’, ‘पाथेय’, ‘महावृक्ष’, ‘मुक्तायन’ हे त्यांचे कवितासंग्रह, तसेच त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये ‘ययाती आणि देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘नटसम्राट’ विशेष लोकप्रिय झाली, ती पॉप्युलरने प्रकाशित केली. १९८८ साली शिरवाडकरांना ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक देऊन त्यांच्या वाड्.मयीन कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, समाजाभिमुखता आणि राष्ट्रीयता ही शिरवाडकरांच्या लेखनाची वैशिष्टये.