प्रत्येक मराठी वाचकाला परिचित असलेले नाव म्हणजे वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज. जवळ जवळ सात दशके त्यांनी सातत्याने लेखन केले. कविता आणि नाटके ही त्यांची मुख्य साहित्यिक कर्तृत्वाची क्षेत्रे ठरली. त्यामध्ये 'नटसम्राट' आणि 'विशाखा' हे मानदंड ठरले.
अशा या अनोख्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचे महत्त्वाचे काम त्यांचे निकटवर्तीय श्री. शं. सराफ यांनी 'कहाणी कुसुमाग्रजांची' या चरित्रग्रंथात केले आहे. स्वत: तात्यासाहेब शिरवाडकरांनी आपली पत्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली होती. तसेच सराफ यांनी चौकस वृत्तीने शिरवाडकरांचे कुटुंबीय, संपादक, प्रकाशक, नाट्यनिर्माते, त्यांनी निर्माण केलेल्या संस्था यांच्याशी असलेल्या संबंधांचा आलेख काढून या चरित्रग्रंथाला पूर्णत्व दिले आहे त्यामुळे या ग्रंथाला एक प्रकारे अधिकृतता प्राप्त झाली आहे. त्यामुळे ही Authorised Biographyच म्हणता येईल.
श्रीकृष्ण शंकर सराफ हे नाशिकच्या पेठे विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून १९८८ साली निवृत्त झाले. कुसुमाग्रज आणि त्यांचे लेखन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. कुसुमाग्रजांच्या जवळ जाऊन त्यांना ओळखणे हे गौरीशंकर शिखर सर करण्याइतके कठीण. पण श्री. शं. सराफ मात्र दीर्घकाळ कुसुमाग्रजांच्या सान्निध्यात राहिले आणि कुसुमाग्रजांसोबत त्यांनी अनेक सुखे-दु:खे वाटूनही घेतली. स्वत: तात्यासाहेबांनी त्यांची महत्त्वाची कागदपत्रे सराफांकडे सुपूर्द केली. एक प्रकारे चरित्रलेखनाचा अप्रत्यक्ष आदेशच शिरवाडकरांनी दिला असे म्हणता येईल. १९७९ साली सराफ यांना आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.